हरभरा लागवड तंत्रज्ञान

हरभरा लागवड माहिती

हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल, तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्‍या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर, योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर, पाणी आणि पीकसंरक्षणाचे योग्य नियोजन, रासायनिक खतांचा संतुलित वापर, वेळीच आंतरमशागत या बाबींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने हरभरा पीक लागवड सुधारीत पद्धतीने करणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडून हस्त नक्षत्रावर पडणार्‍या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन अतिशय मोठमोठ्या क्षेत्रावर या पिकाची लागवड करतात आणि समाधानकारक उत्पादन घेतात.

हरभरा पीक उत्पादन वाढीचे ठळक मुद्दे :

हरभरा पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर प्रामुख्याने खालील बाबींचे अवलंबन करणे गरजेचे आहे.

  • अधिक उत्पादन देणार्‍या आणि रोग प्रतिकारक्षम वाणांचा वापर.

  • योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत

  • वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर

  • बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर

  • तणनियंत्रण

  • पाण्याचे योग्य नियोजन

  • रोग आणि किडींपासून पिकाचे संरक्षण

जमीन व हवामान : हरभरा पिकास मध्यम ते भारी (४५ ते ६० सें.मी. खोल) पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कसदार, भुसभुशीत जमीन आवश्यक असते. वार्षिक ७०० ते १००० मि.मि. पर्जन्यमान असणार्‍या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायत हरभर्‍याचे पीक चांगले येते. उथळ, मध्यम जमिनीत देखील हरभरा येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते. हलकी चोपन अथवा पाणथळ, क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभर्‍यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषत: पीक २० दिवसांचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणत: १० अंश ते १५ अंश सें. ग्रे. आणि कमाल तापमान २५ अंश ते ३० अंश सें. ग्रे. असेल तर पिकाची वाढ चांगली होऊन भरपूर फांद्या, फुले आणि घाटे लागतात. असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. साधारणत: ५.५ ते ८.६ सामू असणार्‍या जमिनीत हरभरा पीक चांगले येते.

पूर्व मशागत : हरभर्‍याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्याबरोबर जमिनीची खोल (२५ सें.मी.) नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. खरीपात शेणखत किंवा कंपोस्ट दिले असल्यास वेगळे देण्याची गरज नाही. परंतु ते दिले नसल्यास हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणीपूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबर महिन्याचे अखेरीस हरभरा पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

पेरणीची वेळ : जिरायत हरभर्‍याची पेर जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजेच सप्टेंबर अखेर अथवा १० ऑक्टोबरपर्यंत करावी. हरभरा पेरणीनंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस पडणार्‍या पावसाचा जिरायत हरभर्‍याच्या उगवण आणि वाढीसाठी चांगला उपयोग होतो. जिरायत क्षेत्रात बियाणे खोलवर (१० सें.मी.) पेरणी करावी. बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभर्‍याच्या पेरणी २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरच्या दरम्यान करावी. तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर (५सें.मी.) हरभरा पेरणी केली तरी चालते. पेरणीस जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन उगवण उशीरा आणि कमी होते. पिकाची वाढ कमी होऊन फांद्या, फुले, घाटे कमी लागतात. यासाठी जिरायत तसेच बागायत हरभर्‍याच्या पेरणी वेळेवर करणे आवश्यक आहे. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि दोन रोपातील अंतर १० सें.मी. राहील अशा पद्धतीने पेरणी करावी म्हणजे प्रती हेक्टरी अपेक्षित रोपांची संख्या मिळते.

बीजप्रक्रिया आणि जिवाणूसंवर्धन : बियाणाची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम+२ ग्रॅम कार्बेन्डेंझीम एकत्र करून प्रति किलो बियाणांस चोळावे. यानंतर १० किलो बियाण्यास रायोबियम जीवाणू संवर्धनाचे २५० ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभर्‍याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे ३ते ५ टक्के उत्पादन वाढते.

बियाणे प्रमाण : हरभर्‍याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाणाचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरीता ६५ ते ७० किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपोर्‍या दाण्यांच्या वाणाकरीता १०० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी.के.व्ही. ४ या जास्त टपोर्‍या काबुली वाणांकरीता १२५-१३० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. ९० सें.मी. रुंदीच्या सर्‍या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला १० सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफशावर पेरणी केली असता रुजावा चांगला होतो.

खते : सुधारीत हरभर्‍याचे नवे वाण खत आणि पाणी यात चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रति हेक्टरी चांगले कुजलेले ५ टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच १२५ किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी.) अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा ५० किलो युरिया आणि ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात १८.५५ टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे. पीक फुलोर्‍यात असताना २ टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

आंतरमशागत : पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३०-४५ दिवसात शेण तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या द़ृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २०-२५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३०-३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवानाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते, दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. मजुरा अभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन (स्टॉम्प) या तणनाशकांची २.५ ते ३ लिटर प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

हरभरा सुधारीत वाण :

सुधारीत वाण
विजय
विशाल
दिग्विजय
फुले विक्रम
विराट
कृपा
पीकेव्हीके २
पीकेव्हीके ४
बीडीएनजी ७९७
साकी ९५१६
जाकी ९२१८

कालावधी :

जिरायत : ८५ ते ९० दिवस, बागायत : १०५ ते ११० दिवस
११० ते ११५ दिवस
जिरायत : ९० ते ९५ दिवस, बागायत : १०५ ते ११० दिवस
११० ते ११५ दिवस
११० ते ११५ दिवस
११० ते ११५ दिवस
११० ते ११५ दिवस
१०५ ते ११० दिवस
११० ते ११५ दिवस
१०५ ते ११० दिवस
१०५ ते ११० दिवस
१०५ ते ११० दिवस
१०५ ते ११० दिवस

उत्पादन (क्विं./हे) :

जिरायत प्रायोगिक उत्पन्न : १४ -१५ सरासरी : १४.००
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३५-४० ; सरासरी : २३.००
उशीरा प्रेर प्रायोगिक उत्पन्न : १६-१८ ; सरासरी : १६.००

जिरायत प्रायोेगिक उत्पन्न : १४-१५
सरासरी : १३.०० बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३५ सरासरी : २०.००
जिरायत प्रायोेगिक उत्पन्न : १४-१५; सरासरी : १४
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३५-४०; सरासरी २३.००
उशीरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न : २२-२४; सरासरी :२१.००
जिरायत प्रायोेगिक उत्पन्न : १०-१२; सरासरी : ११
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३२; सरासरी १९.००
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३२; सरासरी १८.००
बागायत : सरासरी : १६-१८
बागायत : सरासरी : १२-१५
जिरायत : १४-१५
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३२
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३२
सरासरी : १८-२०
बागायत प्रायोगिक उत्पन्न : ३०-३२
सरासरी : १८-२०

वैशिष्ट्ये :

  • अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारित.

  • आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

  • पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसचे उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

  • वाढीचा कल उंच वाढणारा असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्याकरिता योग्य वाण, मध्यम आकाराचे दाणे, मर रोगप्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य. महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित.

  • काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.

  • जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढर्‍या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित.

  • अधिक टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्र राज्यांकरिता प्रसारित.

  • जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, महाराष्ट्र राज्यांकरिता प्रसारित.

  • मध्यम आकाराचे दाणे मराठवाडा विभागासाठी प्रसारित.

  • मध्यम आकाराचे दाणे, मर रोगप्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारित.

  • पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्राकरिता प्रसारित.

पाणी व्यवस्थापन : जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा कूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सर्‍यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबीसुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्याकरिता ३०-३५ दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्याकरिता ३०-३५ दिवसांनी पहिले व ६०-६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे २५ सें.मी. पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (७ ते ८ सें.मी.) देणे महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक-उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास ३० टक्के, दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.

तुषार सिंचन : हरभरा पिकास वरदान : हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यात अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजासाखे रोख पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

हरभरा आंतरपीक : हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभर्‍याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभर्‍याच्या सहा ओळी आणि रबी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूंस किंवा वरंब्याच्या टोकावर १० सें.मी. अंतरावर हरभर्‍याची एक ओळ टोकण केल्यास हरभर्‍याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभर्‍याचा बेवड ऊसाला उपयुक्त ठरून ऊसाच्या उत्पादनात वाढ होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन (घाटे अळी नियंत्रण) : घाटे अळी ही हरभर्‍यावरील मुख्य किड आहे. घाटे अळी ही कीड हरभर्‍याव्यतिरिक्त तूर, मका, सूर्यफूल, टोमॅटो, भेंडी, करडई, कापूस, ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभर्‍याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळित धान्याची पिके घ्यावीत. जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी १०-१२ कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्ष्यांना बसण्यासाठी दर १५-२० मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कीड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे फवारावीत. हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच ५ टक्के निंबोळी अर्काची (२५ किलो/हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी ५ किलो निंबोळी पावडर १० लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुसर्‍या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी ९० लिटर पाणी टाकावे. असे एकूण १०० लिटर द्रावण २० गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी हेलिओकील (विषाणू ग्रासीत अळ्यांचे द्रावण) ५०० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे. यानंतर किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास खाली दर्शवल्याप्रमाणे कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी.
संदर्भ:
कडधान्य सुधार प्रकल्प,
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

Thank you Sir

फुले विक्रम

हरभरा पिक जोडा यादी नाही